Saturday, 29 July 2023

आठवणी दाटतात

 

 

आठवणींच्या हिंदोळ्यावर आपण सारे नेहमीच झुलत असतो. त्यातल्या त्यात एखाद्या वळणावर उभे असलो..काही परिवर्तने येणार असतील आयुष्यात, तर अधिकच हळवे होऊन पहातो आपण भूतकाळाकडे! काही घटना अगदी स्पष्ट, आताच जगल्या सारख्या आठवतात. मनाच्या कप्प्यात साठवलेले तरल, सूक्ष्म अनुभव पुन्हा जिवंत होतात, मनाला ताजेतवाने करून जातात.


अमेरिकेतील वास्तव्य संपवून परत भारतात जाण्यास, आपल्या जिवलग मित्रमैत्रिणींना भेटण्यास उत्सुक मनाने जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा जाणवतं, किती भरभरून जगलो आपण गेली काही वर्षे! मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यातून एकदम शांत वातावरणात आलो. ‘जरा विसावू या वळणावर’ असे म्हणून थबकलो. आपल्याला इथे जे सखे सोबती भेटले ते आपलं आयुष्य अधिकच समृद्ध करून गेले. कुणी चिरंतन टिकणारे विचार दिले, तर कुणी स्वत:ला येणारं काही शिकवून गेले.


 इथेच आपल्या जगण्याला अध्यात्माचा परीसस्पर्श लाभला. मंत्रजपातून होणाऱ्या अननुभूत आनंदाचा अनुभव प्रथम मिळाला ते क्षण तर कधीच विसरू शकत नाही. इथल्या देवळाच्या मंडपात मंत्रजप होत होता. सुस्वर गायन, पेटीची साथ, झांजा , तबला, ढोलक सगळ्यां वाद्यांचा मेळ जुळून आला होता.. सारं वातावरण त्या मंत्राने भारलेलं, शब्दश: ‘मंत्रमुग्ध’ झालेलं होतं! ‘आवडी लाठी (जप) मुखासी’ असे तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, तो प्रत्यय असाच असेल का असा विचार मनाशी येतो न येतो तोच देवाच्या मूर्तीवर वाहिलेलं एक फूल अचानक पडलं. त्याच्या कारणांची मीमांसा करावी असे नाही वाटले. ज्या चैतन्याने आपण हेलावलो  त्या लहरी खरोखर आसमंतात देखील विहरत आहेत या जाणीवेने डोळे पाणावले.


कालांतराने  मंत्रजपातून निर्माण होणाऱ्या अवीट आनंदाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. इथल्या वास्तव्याने दिलेली ही सगळ्यात मोठी शिदोरी! कितीही वाटली तरी न संपणारी, आयुष्यभर पुरेल अशी!


 ©  श्रेया श्रीधर महाजन . 

१६ ऑक्टोबर २०१२ 


 


 

No comments:

Post a Comment

श्रावणसरी

सोशिक माती, अशी सारखी वर्षावाने भिजे युगायुगांची उत्कट आशा अक्षर होऊन रुजे|| केव्हा हसणे, केव्हा रडणे, कधी सोसणे कळा असा चालला इथे सनातन सृज...