Saturday, 5 August 2023

कथा कथेची

आटपाट नगर होतं. तिथे एक राजा राज्य करीत होता…अशी नुसती सुरुवात वाचली तरी हा साहित्यप्रकार कोणता ते आपण सहज ओळखू शकतो. गोष्ट हा “वाङ्मयप्रकार” आहे अशी जाणीव होण्याच्या आधीपासून ती आपल्या अंगवळणी पडलेली असते.

आई  वा आजीने सांगितलेल्या गोष्टी, गंमतगोष्टी, गुजगोष्टी असे वाचत वाचत फ़ास्टर फ़ेणे, चिंगी आणि गोट्या इथपासून म्हैस आणि इतर कथांपर्यंतचा आपला प्रवास झटकन डोळ्यांसमोर येतो. याव्यतिरिक्त कधी काही दंतकथा, पुराकथा कानी पडतात. एखादा किस्सा एखादा गोष्टीवेल्हाळ मनुष्य रंगवून सांगतो तेव्हा ती देखील कथाच असते. शाळेत असताना पंचतंत्र, हितोपदेश, इसापनीती अशा बोधकथा वाचलेल्या असतात. तर कुणाला “युद्धस्य कथा रम्या” म्हणत युद्धकथा आवडू लागतात. कधीतरी शाळेत असताना आवाज, जत्रा असले दिवाळी अंक हाती पडतात त्यातल्या विनोदाची भलतीच वेगळी जातकुळी जाणवलेली असते तर कधी “स्त्रियांसाठी” विशेष मासिकांतल्या घरगुती हलक्याफ़ुलक्या कथा वाचल्या जातात. थोडी अक्कल आल्यावर जीए आवडू लागलेले असतात.. तर कधी हिमालयातील योगी, तिबेटातील योगी यांच्या चरित्रकथा आवडतात. एकेकाळी संपूर्ण चातुर्मास हे पुस्तक हाती लागलं तर अनेक व्रतांच्या कहाण्या “साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफ़ळ संपूर्ण” इथपर्यंत वाचून काढल्याचं स्मरतंय..! एकूण गोष्ट/कथा/ कहानी ही आपल्या आयुष्यात चांगलीच सामावून गेलीये.


तिच्या गरजा देखील फ़ार नाहीत. एक वा अनेक नायक, नायिका, आसपासचा परिसर, वस्तु काहीही केंद्रस्थानी असेल तरी कथा रचता येते. ती पूर्णत: कविकल्पित असेल तर तिला “कथा” म्हणावं जर वास्तवाचा अंश असेल तर “आख्यायिका” म्हणावं. कथेचा जीव छोटा असेल एखाद- दोन केंद्रवर्ती पात्रं असतील तर ‘लघुकथा’ म्हणावं. परंतु कथानकाचा पट फ़ार मोठा, गुंतागुंतीचा असेल तर ‘दीर्घकथा वा कादंबरी’ म्हणावं. ‘नॉव्हेल’ या अर्थी आपण कादम्बरी हा शब्द वापरतो. मात्र हे चिरपरिचित आहे की बाणभट्ट नावाच्या कवीने कादंबरी हे गद्यकाव्य रचलं. ते इतकं प्रसिद्ध झालं की ज्यामुळे हाच शब्द प्रचलित झाला. एका पेटीच्या आत दुसरी पेटी , त्यात तिसरी असावी तशी कथानकांची गुंफ़ण यात केली आहे. एखाद्या निबिड जंगलाचं सौंदर्य पहाता त्यात हरवून जावं तसं या कथानकांत हरवून जायला होतं.

कथेतील पात्रं, पार्श्वभूमी, संवाद, व्यक्तिचित्रणे, भाषाशैली या सगळ्या गोष्टी कथेला अलंकृत करीत असतात. मात्र तिचा आत्मा हा तिच्या कर्त्यावर, त्याच्या निरीक्षणशक्तीवर अवलंबून असतो. पल्लेदार वाक्यरचना ते अगदी सुटसुटीत वाक्यरचना इथपर्यंतचा कथेचा प्रवास रोचक आहे. अनेकदा धक्कादायक शेवट करण्यात कथाकारांना विशेष रस असतो. तर कधीकधी शेवट अगदी सहज सांगू शकू असा असतो. शैली बहुतेक वेळा गद्यात्मक असते. प्राचीन काळी मात्र गद्यपद्यात्मक (उदा:पंचतंत्र)तसेच पूर्णत: पद्यात्मक (उदा:कथासरित्सागर) शैलीचा देखील कथावाङ्मयात उपयोग केलेला दिसतो.  ऋग्वेदातील सरमा पणि कथांसारखी संवादसूक्त, उपनिषदे  वा ब्राह्मणांमध्ये विवेचनात येणार्‍या कथा, पुराणे इथपासून सुरुवात झालेल्या या कथावाङ्मयाने मानवी जीवन मोठे समृद्ध केले आहे. खरे तर प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य हीच एक आगळीवेगळी, सतत घडणारी कथा आहे...डोळसपणे अनुभवत रहायला हवी....! © श्रेया श्रीधर महाजन . १ जानेवारी २०१४



No comments:

Post a Comment

श्रावणसरी

सोशिक माती, अशी सारखी वर्षावाने भिजे युगायुगांची उत्कट आशा अक्षर होऊन रुजे|| केव्हा हसणे, केव्हा रडणे, कधी सोसणे कळा असा चालला इथे सनातन सृज...